चिंचवड, १९ नोव्हेंबर – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचा संकल्प करण्यात आला असून त्यासाठी मतदार जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क आहे. तरीदेखील अनेक मतदार मतदानाबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. प्रत्येकाने हक्क नव्हे तर कर्तव्य म्हणून मतदान केले पाहिजे. यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राज्यभर उमेदवार व मतदारांना प्रत्यक्ष भेटून तसेच समाज माध्यमांतून मतदानाबाबत जनजागृती करीत आहेत. डॉ. गोविंदजी कुलकर्णी यांनी चिंचवडे विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांची भेट घेऊन त्यांना या मोहिमेविषयी माहिती दिली. शंकर जगताप यांनी त्यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास त्यांनी जगताप यांना दिला.
महासंघाच्या या जनजागृतीमुळे मतदानाचा टक्का वाढून चांगले उमेदवार निवडून येतील, असा विश्वास डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.