डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही प्रेरणादायी – योगेश बहल
विविध मान्यवरांची उपस्थिती
पिंपरी, दि. १४ एप्रिल – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजात सामाजिक समता, बंधुता आणि न्याय यांच्या मूल्यांची बीजे रोवली. त्यांचे विचार आजही नव्या पिढीसाठी दीपस्तंभासारखे आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आज येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी येथील कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात बहल बोलत होते. या प्रसंगी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहल पुढे म्हणाले, “आंबेडकर हे केवळ दलितांचेच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीचे शिल्पकार होते. त्यांनी संविधान निर्मिती, स्त्री-पुरुष समता, कामगारांचे हक्क, आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर झगडले.”
हे हि वाचावे
पिंपरीत ‘मिरॅकल ऑन व्हील्स’द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना
या कार्यक्रमात महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी डॉ. आंबेडकरांचे स्त्री सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान अधोरेखित करताना सांगितले, “आंबेडकरांनी स्त्रियांच्या शिक्षणास आणि सन्मानास नेहमी प्राधान्य दिले. समाजातील स्त्रीची स्थिती हा समाजाचा आरसा आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते.”
कार्यक्रमात माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. “त्यांनी विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय संविधानाला आधुनिकतेचा आणि समतेचा पाया दिला. त्यांच्या नेतृत्वामुळेच देशात आज लोकशाही टिकून आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेवक सतीश दरेकर, अमिना पानसरे, ॲड. गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, राजेंद्रसिंग वालिया, विजय लोखंडे, श्रीधर वाल्हेकर, महेश झपके, संजय औसरमल, विनोद वरखडे, कविता खराडे, ज्योती गोफणे, रवींद्र ओव्हाळ, श्रीकांत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
या अभिवादन सोहळ्याने पिंपरी-चिंचवडमध्ये सामाजिक ऐक्य आणि आंबेडकरी विचारांची उजळणी केली. उपस्थित सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार करून समाजसेवेस वाहून घेण्याची प्रतिज्ञा घेतली.