पिंपरी, दि. २७ मे २०२५ :
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सज्ज झाली आहे. येत्या १९ व २० जून रोजी आषाढीवारी पालखी सोहळा पिंपरी चिंचवड शहरात दाखल होणार असून, या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली. त्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून, नियोजनाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीला विविध शासकीय, निमशासकीय संस्था, वारकरी महामंडळ, देवस्थान समित्या आणि पोलीस विभाग उपस्थित होते. यामध्ये संत तुकाराम व ज्ञानेश्वर देवस्थान समित्या, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, महाराष्ट्र वारकरी महामंडळ, पोलीस व वाहतूक विभाग, महावितरण, आळंदी व देहू नगरपरिषद, आणि विविध महापालिका अधिकारी सहभागी झाले होते.
या बैठकीमध्ये पालखी मार्गावरील सर्वांगीण सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली. महापालिकेने आतापर्यंत केलेल्या तयारीचे सादरीकरण करण्यात आले तर पोलीस व अन्य यंत्रणांनी आपले नियोजन स्पष्ट केले.
महत्त्वाच्या सूचना आणि कार्यवाहीसाठी निर्देश
बैठकीत आलेल्या मुख्य सूचनांमध्ये पालखी मार्गावर दिशादर्शक फलक, स्वच्छतागृहे व स्नानगृहांची संख्या वाढवणे, मोटार सायकल रुग्णवाहिकेची व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि वीज पुरवठ्याची अखंड व्यवस्था, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, बॅरिकेटस् व संरक्षक उपाय, तसेच वृक्षछाटणी व रस्त्यावरील खड्डे बुजवणे यांचा समावेश होता.
आयुक्त शेखर सिंह यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यांनी सांगितले की, “वारकऱ्यांच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे. पावसाळा लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सज्ज असावी.”
वारकऱ्यांसाठी सुविधा आणि सुरक्षितता
महापालिकेच्या वतीने फिरती वैद्यकीय पथके, फिरती शौचालये, पालखी मुक्काम ठिकाणी पार्किंग फलक, पावसाचे पाणी तुंबू नये म्हणून निचरा व्यवस्था, तसेच जंतुनाशक फवारणी यांसारखी कामे करण्यात येणार आहेत. वारकरी भवनासाठी जागा उपलब्ध करून देणे यावरही भर देण्यात आला आहे.
आषाढीवारी पालखी सोहळा पिंपरी चिंचवड शहरासाठी केवळ धार्मिक उत्सव नाही, तर सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.