महात्मा फुले यांचे विचार तरुण पिढीसाठी प्रेरणादायी – शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन
पिंपरी (दि. ११ एप्रिल): “विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, इतके अनर्थ अविद्येने केले!” – हे क्रांतिकारी विचार मांडणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचे स्मरण करून दिले आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर शिक्षणाचे खरे शिल्पकार होते. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात भिडे वाड्यात स्थापन केलेली मुलींची पहिली शाळा हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतिक आहे. या ऐतिहासिक घटनेचा गौरव करताना बहल म्हणाले, “आज आपण लिहू-वाचू शकतो, याचे श्रेय फुले दाम्पत्यांच्या अडथळ्यांवर मात करून उभ्या राहिलेल्या शिक्षण चळवळीला जाते.”
हे हि वाचावे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड. गोरक्ष लोखंडे, माजी नगरसेवक प्रकाश सोमवंशी, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, महिला कार्याध्यक्षा कविता खराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
योगेश बहल पुढे म्हणाले की, “महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेदाच्या विरोधात लढा देऊन समाज परिवर्तनाचा पाया रचला. आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श समोर ठेवून सामाजिक न्याय आणि समतेसाठी कार्य केले पाहिजे.”
कार्यक्रमात ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी फुले दाम्पत्याच्या कार्यावर प्रकाश टाकत सांगितले की, “जगातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि त्यांना साथ देणारे महात्मा फुले यांच्यामुळेच आज आम्ही शिक्षण घेत आहोत. त्यांचा आदर्श हे आजच्या काळात जिवंत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.”
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबत अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
सदर कार्यक्रमामध्ये दीपक साकोरे, संजय औसरमल, श्रीकांत कदम, रविंद्र ओव्हाळ, संपत पांचुदकर, भाग्यश्री म्हस्के, सपना कदम, निलम कदम, शमा सय्यद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
महात्मा फुले यांचे विचार केवळ १९व्या शतकापुरते मर्यादित नाहीत, तर आजही शिक्षण, समानता आणि स्त्री सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्यांना प्रेरणा देतात. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे समाज सुधारण्यासाठी घेतलेली नवी शपथच आहे, असे कार्यक्रमाच्या समारोपास शहराध्यक्ष बहल यांनी सांगितले.