महिला सक्षमीकरण कार्यशाळा: सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा पोलिसांचा सल्ला
पिंपरी, पुणे (५ मे २०२५):
“अमिषाला बळी पडू नका. सायबर फसवणुकीपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवा,” असा मोलाचा सल्ला पिंपरी पोलिस स्टेशनच्या सायबर विभागाच्या पोलिस उपनिरीक्षक विद्या पाटील यांनी दिला. एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे नुकत्याच पार पडलेल्या महिला सक्षमीकरण कार्यशाळा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यशाळेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आले होते. या वेळी त्यांनी सायबर गुन्हेगार कशा प्रकारे नागरिकांना, विशेषतः महिलांना व वयोवृद्धांना लक्ष्य करतात याची सविस्तर माहिती दिली.
हे हि वाचावे
मुंबईच्या जंगलात आता 54 बिबटे – वन विभागाचा मोठा खुलासा ! जंगलात काय घडतंय?
त्या म्हणाल्या, “घरबसल्या पैसे मिळवण्याचे आमिष, बक्षिसे, मोफत कर्ज यांसारख्या प्रलोभनांच्या आड सायबर गुन्हेगारीचे जाळे लपलेले असते. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, ओटीपी शेअर करणे, किंवा कोणत्याही बँक व सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने आलेले कॉल्स याबाबत जागरूक राहा.”
महिला सक्षमीकरण कार्यशाळा या विषयावर झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थिनींसह शिक्षकवृंद, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांची उपस्थिती होती.
सायबर गुन्हेगारीबाबत अधिक जाणून घ्या – महाराष्ट्र सायबर विभाग
महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ होण्यासाठी सकारात्मक सल्ला
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहावे, यावर भर दिला. त्या म्हणाल्या, “प्रत्येकाने नियमित व्यायाम, प्राणायाम व संतुलित आहार घेणे अत्यावश्यक आहे. शैक्षणिक तणावाचे व्यवस्थापन आणि कुटुंबात संवाद वाढवणे यामुळे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊ शकते.”
एसबीपीआयएम च्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले तर डॉ. रुपाली कुदरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला पीसीईटी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर व कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांची शुभेच्छा लाभली.
सतर्क रहा, सुरक्षित रहा – सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याचा मंत्र
कार्यशाळेद्वारे सहभागी महिलांना केवळ महिला सक्षमीकरणच नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये सुरक्षित राहण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. सायबर जागरुकता, आत्मविश्वास, आरोग्याची काळजी आणि भावनिक स्थैर्य ही महिला सबलीकरणासाठी अत्यावश्यक बाबी आहेत, हे या कार्यशाळेतून अधोरेखित झाले.