भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला पूर्णविराम देऊन मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य : शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केल्या भावना
मोदी सरकारच्या ११ वर्षांची कामगिरी: पारदर्शक प्रशासनाचा आदर्श
पिंपरी-चिंचवड:
भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि घोटाळ्यांना बाजूला सारत, मोदी सरकारच्या ११ वर्षांची कामगिरी ,पारदर्शकता, विकास आणि गरीब कल्याणावर आधारित असून भारताला आत्मनिर्भर बनवण्याची दिशा ठरली आहे.
प्रवास हा पारदर्शकता, प्रामाणिकता आणि जनकल्याणाच्या दिशेने झपाट्याने सुरू राहिल्याचे मत भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ११ वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील मोरवाडी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विविध योजनांचा आणि धोरणांचा आढावा घेत विकसित भारताच्या दिशेने भारताची वाटचाल स्पष्ट करण्यात आली.
गेल्या ११ वर्षांत निर्णायक बदल
श्री. काटे म्हणाले की, मोदी सरकारच्या ११ वर्षांची कामगिरी म्हणजे पारदर्शक व उत्तरदायित्व असलेले प्रशासन. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) मुळे योजनांचे लाभ थेट नागरिकांच्या खात्यात जमा होतात. GST मुळे कर प्रणाली सुलभ झाली असून, भ्रष्टाचारावर आळा बसला आहे.
इतिहास घडवणारे निर्णय
कलम ३७० रद्द करणे, राम मंदिर निर्माण, काशी विश्वनाथ कॉरिडॉर अशा निर्णयांनी राष्ट्रीय अस्मिता आणि सांस्कृतिक पुनरुत्थानास चालना दिली. ‘शासन म्हणजे सेवा’ या तत्वाला अनुसरून योजनांची अंमलबजावणी झाली.
गरीब कल्याण आणि सामाजिक न्याय
प्रधानमंत्री आवास योजनेतून ३० लाख घरे, उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस, ८१ कोटींना अन्नसुरक्षा, ५५ कोटी जनधन खाती, आयुष्मान भारत योजनेतून मोफत उपचार, मुद्रा योजनेतून ५२ कोटी स्वयंरोजगार – हे सर्व मोदी सरकारच्या विकास प्रवासाचे ठळक दाखले आहेत.
महिलांचा सक्षमीकरण आणि शिक्षण क्षेत्रातील क्रांती
३३% महिला आरक्षण, ३ कोटी ‘लखपती दीदी’, ७३% घरे महिलांच्या नावावर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ८ नवीन IIM आणि ४९० विद्यापीठे स्थापन करून महिलांच्या सक्षमीकरणास आणि शिक्षण क्षेत्राला बळकटी दिली आहे.
शेतकरी आणि तरुणांसाठी भरीव पावले
शेतकरी खात्यावर थेट ३ लाख कोटी रुपये जमा, सिंचन प्रकल्पात २५ हजार कोटींची गुंतवणूक, MSP मध्ये वाढ, सौर पंपांची वाढ, सहकार मंत्रालय स्थापन – या निर्णयांनी शेतकरी हिताचे रक्षण झाले आहे.
तरुणांसाठी स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, EPFO खाती, करमाफी यांसारखे निर्णय लाभदायक ठरले.
राष्ट्र सुरक्षा आणि जागतिक प्रतिष्ठा
LOC वर महिलांची तुकडी, ऑपरेशन सिंदूर, संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरण, २४ हजार कोटींची मेड इन इंडिया खरेदी, चांद्रयान-३ यशस्वी मोहिम – या गोष्टींमुळे भारताची जागतिक पातळीवरील प्रतिमा उजळली आहे.
आर्थिक झेप आणि जागतिक स्थान
२०१४ मध्ये १०व्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था आज चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून, ३ वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. परकीय गुंतवणुकीत २६% वाढ आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य साधले गेले.

