पिंपरी, पुणे | प्रतिनिधी :
महाराष्ट्रात संत-महात्म्यांच्या नावाने वेगवेगळ्या समाजांच्या आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करून हे सरकार जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण करीत आहे, असा गंभीर आरोप बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केला.

पिंपरी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ आणि मायक्रो ओबीसी, अलुतेदार, बलुतेदार, विमुक्त, भटके समाजाच्या जिल्हा प्रतिनिधींच्या चिंतन बैठकीत दळे यांनी आपले विचार मांडले. या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव गुरव, कार्याध्यक्ष सतीश दरेकर, सरचिटणीस चंद्रकांत गवळी, शशिकांत आमने, मुकुंद मेटकर, किशोर सूर्यवंशी, सतीश कसबे, चंद्रकांत कापडे, बाळासाहेब शेलार, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अभिमन्यू दहितुले यांसह राज्यभरातील जिल्हा व तालुका प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारकडून समाजांमध्ये विभागणी – कल्याणराव दळे
कल्याणराव दळे म्हणाले, “संतांच्या नावाने वेगवेगळ्या समाजांची महामंडळे स्थापन करून सरकार समाजात फूट पाडत आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी, कार्यालय व कॅबिनेट मंत्री दर्जा देण्यात आला आहे. मात्र, ओबीसी समाजाच्या महामंडळांना केवळ उपकंपनीचा दर्जा देऊन निधीही मर्यादित ठेवण्यात आला आहे. हा उघड अन्याय तातडीने दूर करावा.”
त्यांनी पुढे सांगितले, “माळी, धनगर, वंजारी या समाजांनी आरक्षणातील राजकीय जागा, शैक्षणिक व कर्जसुविधांचा लाभ घेतला असला तरी मायक्रो ओबीसी, बलुतेदार, अलुतेदार, भटके आणि विमुक्त समाज आजही वंचित आहेत. या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहिणी आयोगाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी.”
मायक्रो ओबीसी समाज वंचिततेच्या छायेत
महासंघाचे उपाध्यक्ष प्रतापराव गुरव यांनी सांगितले की, ग्रामीण भागात मायक्रो ओबीसी आणि विमुक्त समाजातील काहीच कुटुंबे उरली आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादात हे समाज होरपळून निघत आहेत. “त्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करते,” असे गुरव यांनी सांगितले.
सरचिटणीस चंद्रकांत गवळी यांनी म्हटले की, “राज्य सरकारने आतापर्यंत विविध महामंडळांना दिलेल्या निधीचा खर्च जाहीर करावा. त्यासाठी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून पारदर्शकता राखावी.” बैठकीत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना, रोहिणी आयोगाची अंमलबजावणी, आणि महामंडळ निधीवरील माहिती जाहीर करण्याची मागणी करणारे ठराव मंजूर करण्यात आले.
महासंघाकडून निवडणुकांमध्ये उमेदवार उभारणी
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून किमान दहा उमेदवार उभे करून सामाजिक जनजागृतीचे अभियान राबवले जाईल, अशी घोषणा करण्यात आली.
बैठकीत अभिमन्यू दहितुले यांची बारा बलुतेदार महासंघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. कल्याणराव दळे यांच्या हस्ते दहितुले यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

