इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प आता केवळ सौंदर्यीकरणासाठी न राहता, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत पर्यावरण रक्षणासाठी दिशा ठरतोय.
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प आता नव्या दिशेने वाटचाल करणार आहे. फक्त सौंदर्यीकरणावर भर न देता प्रदूषण रोखणाऱ्या उपाययोजनांचा समावेश करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. पर्यावरण प्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला असून, भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण प्रेमी आणि संस्था-संघटनांनी नदी प्रदूषण व सुधार प्रकल्पातील त्रुटींविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जैवविविधा उद्यान, वृक्ष लागवड व पुन:रोपण आदी शाश्वत उपाययोजना सुचवलेल्या होत्या. या सर्व मुद्द्यांचा समावेश इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये करण्याची मागणी आमदार लांडगे यांनी प्रशासनाकडे केली. याला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
हे हि वाचावे
भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय: चिखली-कुदळवाडीची प्रस्तावित TP Scheme अखेर रद्द!
नदी पुनरुज्जीवनासाठी अमृत योजनेचा आधार
पिंपरी-चिंचवड महापालिकेने इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प राज्य शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत राबवण्यात येणार असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता त्याला मिळाली आहे. पर्यावरण प्रेमींनी केलेल्या सूचनांच्या आधारे आता सुधारित आराखडा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आमदार लांडगे यांना पत्राद्वारे दिली आहे.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC), भारत सरकार:
पिंपळे निलख प्रकरण: कामाला तात्पुरती स्थगिती
दरम्यान, पिंपळे निलख येथे मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामाला पर्यावरण प्रेमींचा विरोध होत होता. स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या या कामामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर सदर प्रकल्पाच्या कामावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून, या प्रकरणाचा पुन्हा सखोल आढावा घेण्यात येणार आहे.
शाश्वत उपाययोजना हीच खरी गरज – आमदार महेश लांडगे
“शहरातील जीवनवाहिन्या असलेल्या नद्यांचे प्रदूषण कमी करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. पर्यावरण प्रेमी व संस्था-संघटनांनी जे मुद्दे मांडले आहेत, ते योग्य असून त्यांचा समावेश प्रकल्पात केला जात आहे. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प शाश्वत पद्धतीने यशस्वी होण्यासाठी शासनस्तरावर मी सतत पाठपुरावा करणार आहे,” अशी प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी दिली.