पिंपरी-चिंचवड : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त घरकुल परिसरात उत्साहपूर्ण आणि सामाजिक वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, घरकुल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिक, समाजबांधव तसेच महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमास चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव प्रमुख उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रसार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या न्याय-हक्कांसाठी अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून दिलेला लढा आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. घरकुल परिसरात जयंती उत्सवामुळे उत्साहाचे आणि सामाजिक एकतेचे वातावरण निर्माण झाले होते.
“अण्णाभाऊंचे विचार घराघरात पोहोचवून सामाजिक समता, शिक्षण आणि परिवर्तनाचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

