नागरिकांना ई-प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन; हरित जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश
पिंपरी, दि. ११ मार्च २०२६ : पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या “माझी वसुंधरा ६.०” अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना ई-प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसुंधरेचे संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि हरित जीवनशैलीचा स्वीकार यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, पाणी व ऊर्जेची बचत करावी, प्लास्टिकचा वापर कमी करावा तसेच स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश देण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, हरित आणि वसुंधरापूरक ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.
हा उपक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने या ई-प्रतिज्ञेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
नागरिक खालील लिंकवर भेट देऊन वसुंधरा संवर्धनासाठी आपली ई-प्रतिज्ञा , वैयक्तिक अथवा सामूहिकरित्या देखील नोंदवू शकतात.
ई-प्रतिज्ञा लिंक
https://majhivasundhara.in/en/lets-pledge
वसुंधरेचे रक्षण ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडकरांनी हरित जीवनशैलीचा स्वीकार करून पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवावा.
– रवि लांडगे
महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
शाश्वत आणि वसुंधरापूरक शहर उभारण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानाच्या ई-प्रतिज्ञेत सहभागी होऊन प्रत्येकाने वसुंधरा संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी.
– श्रावण हर्डीकर
आयुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

