पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाची ‘अभय योजना’ १ मार्चपासून सुरू
पिंपरी, २७ फेब्रुवारी २०२६ : शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर हा अत्यंत महत्त्वाचा महसूल स्त्रोत असून रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा या नागरिकांच्या करातूनच उभ्या राहत आहेत. वेळेत कर भरणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची कर्तव्यभावना आहे.
आतापर्यंत शहरातील ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे ७४७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. वसुली मोहिमेला अधिक गती देण्यासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष पथके कार्यरत असून थकबाकीदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. तसेच वर्तमानपत्रे, सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
तथापि, शहरातील सुमारे २ लाख १२ हजार ४४० मालमत्ताधारकांकडे अद्याप थकीत मालमत्ता कर प्रलंबित आहे. संबंधितांनी विलंब न करता तात्काळ थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
विशेष ‘अभय योजना’ जाहीर
कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत थकीत मालमत्ता कर वसुलीस गती देण्यासाठी दि. १ मार्च २०२६ पासून विशेष ‘अभय योजना’ सुरू करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत:निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक आणि मोकळ्या जागांच्या मालमत्तांना लाभ थकीत कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यास मनपा करावरील बिलंब दंडावर तब्बल ९०% सवलत ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी लागू राहणार आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील थकबाकीसह संपूर्ण रक्कम या कालावधीत एकरकमी भरल्यासच सवलतीचा लाभ मिळणार आहे.
“महापालिकेची ‘अभय योजना’ ही नागरिकांना दिलेला विश्वासाचा शब्द आहे. थकबाकीमुळे वाढलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी मनपा करावरील बिलंब दंडात ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. शहराच्या विकासात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही मर्यादित कालावधीची संधी साधून ३१ मार्चपूर्वी थकीत मालमत्ता कर भरावा.”
— रवि लांडगे, महापौर
“१ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकीत रक्कम एकरकमी भरल्यास मनपाकर शास्तावर ९० टक्के सवलत लागू होईल. ही योजना सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी लागू आहे. थकबाकीदारांनी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित भरणा करावा. मुदत संपल्यानंतर नियमित वसुली प्रक्रिया सुरू राहील.”
— श्रावण हर्डीकर
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
✔ सवलतीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपूर्वी पूर्ण भरणा आवश्यक
✔ मुदत संपल्यानंतर नियमित दंड आणि वसुली कारवाई सुरू राहील
✔ अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा
शहराच्या विकासासाठी आणि आर्थिक शिस्त राखण्यासाठी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

