प्रसाद ओक म्हणाले, “ हास्यजत्रा या मनोरंजनात्मक कार्यक्रमाने संकटकाळात महाराष्ट्राला आनंद दिला.” दिशा सोशल फाउंडेशनतर्फे दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम.
पिंपरी, पुणे (२९ एप्रिल २०२५):
“हास्यजत्रा ही केवळ एक मालिका नाही, ती संकटकाळात महाराष्ट्राच्या मनाला दिलासा देणारी ऊर्जा आहे,” असे मत ज्येष्ठ अभिनेते प्रसाद ओक यांनी पिंपरीतील एका विशेष कार्यक्रमात मांडले.
दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित “निमित्त गुलकंदचे, दिलखुलास गप्पा हास्य जत्रेच्या टीमसोबत” या कार्यक्रमात हास्यजत्रा कलाकारांनी प्रेक्षकांशी मनमोकळा संवाद साधला. प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात विनोद, संवाद आणि प्रेरणा यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला.
हास्य आणि आरोग्याचा संबंध – प्रसाद ओक यांचे विचार
प्रसाद ओक म्हणाले, “कोरोनासारख्या काळोख्या पर्वात हास्यजत्रेने लोकांना मानसिक आधार दिला. विनोद हे आरोग्यासाठी अत्यावश्यक असते. आम्ही नेहमीच शुद्ध आणि स्वच्छ विनोद देण्याचा प्रयत्न केला.”
ते पुढे म्हणाले, “कलाकारांचा रुबाब पडद्यावर असावा, प्रत्यक्ष आयुष्यात तो नाही. भूमिका किती मोठी किंवा लहान आहे, यापेक्षा ती भूमिका प्रामाणिकपणे साकारणे महत्त्वाचे आहे.”
गुलकंद सिनेमाचा टीजर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कलाकारांचे विचार आणि प्रेरणा
कार्यक्रमात अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाल्या, “कलाकाराने ठराविक चौकटीत अडकून न राहता सतत प्रयोगशील राहावे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामावर श्रद्धा ठेवा.”
दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सिनेमा निर्मितीतील आव्हानांबद्दल सांगताना म्हटले, “नाट्यप्रयोगांच्या तुलनेत सिनेमा हा अधिक अस्वस्थ करणारा प्रवास असतो. मात्र आत्मविश्वास टिकवला तर कोणतीही भीती राहत नाही.”
लेखक सचिन मोटे यांनी सांगितले की, “समीर चौघुले यांचा हा नायक म्हणून पहिलाच सिनेमा असून, २९ वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना हे यश मिळाले आहे.”
हे हि वाचावे
“आज गुलकंद सिनेमा टीम चिंचवडमध्ये; प्रसाद ओक, सई ताम्हणकर यांच्यासोबत थेट दिलखुलास गप्पा!”
सन्मान आणि श्रद्धांजली
कार्यक्रमात राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते प्रसाद ओक व समीर चौघुले यांचा, तर इतर मान्यवरांच्या हस्ते सचिन मोटे, सचिन गोस्वामी, सई ताम्हणकर, ईशा डे आणि गायिका सावनी रवींद्र यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
उपस्थित मान्यवर आणि सूत्रसंचालन
या कार्यक्रमास राहूल कलाटे, सचिन साठे, पृथ्वीराज साठे, कांतीलाल गुजर, राजू बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. नाना शिवले यांनी प्रास्ताविक केले तर अक्षय मोरे यांनी रसाळ सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन सई ताम्हणकर यांनी केले.
हा कार्यक्रम हे केवळ एक मनोरंजनाचे माध्यम नसून मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असलेला हास्याचा स्रोत आहे. असा संवाद समाजात सकारात्मकतेचा संचार करतो.