विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासासाठी घेतली हरित इमारत आणि पर्यावरण संरक्षणाची शपथ
पिंपरी, पुणे (८ मे २०२५):
शहरीकरणाच्या वेगाने वाढत्या काळात हरित इमारत ही गरज बनली आहे, असे स्पष्ट करत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (PCCOER), रावेत येथे ‘हरित इमारत आणि IGBC चे उद्दिष्ट’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक बांधकामासाठी शपथ घेतली.
हे हि वाचावे
“”137 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्रम महर्षी’ पुरस्कार”
या चर्चासत्राचे आयोजन PCCOER, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) आणि इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यामध्ये इमारत रचना, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनावर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
Indian Green Building Council (IGBC) अधिकृत संकेतस्थळ
स्प्राउट कन्सुल्टन्सीच्या संचालक नम्रता धामणकर यांनी “हरित इमारत केवळ एक पर्याय नसून ती काळाची गरज आहे. ही इमारत उर्जा, पाणी, सामग्री यांचा कार्यक्षम वापर करते, तसेच पर्यावरणाचा समतोल राखते,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, स्थापत्य विभाग प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे, आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी आणि आर्किटेक्ट ऋजुता पाठक यांची उपस्थिती होती.
आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी यांनी इमारतीचे फायदे स्पष्ट करताना सांगितले, “संसाधनांचा योग्य वापर, आरोग्यस्नेही वातावरण आणि कमी प्रदूषण या बाबींचा समावेश असलेल्या इमारती शाश्वत भविष्यासाठी महत्त्वाच्या ठरतात.”
या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी “हरित इमारत हीच दिशा, निसर्ग रक्षण हीच निशा” अशी शपथ घेत, शाश्वत पर्यावरणासाठी वचनबद्धता दर्शवली. हे दृश्य उपस्थित प्राध्यापक आणि पाहुण्यांसाठी प्रेरणादायक ठरले.
पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. तिवारी यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे कौतुक करत सांगितले की, “विद्यार्थ्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका ही भविष्यातील सशक्त आणि पर्यावरणपूरक भारताची नांदी आहे.”
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे पीसीईटी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चेतन चव्हाण यांनी केले तर डॉ. सुदर्शन बोबडे यांनी स्वागतपर भाषण केले.