‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील विविध विभागांचा महापौरांकडून आढावा; स्वच्छता, अतिक्रमण, पाणीपुरवठा आणि नालेसफाईवर भर
पिंपरी, दि. १० मार्च २०२६ :
पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक असून, नगरसदस्य तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा प्राधान्याने व वेळेत निपटारा करावा, अशी स्पष्ट सूचना महापौर रवि लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिली. शहर स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख ठेवण्यासाठी प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी, कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण, अतिक्रमणांवर कारवाई करताना फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसह आवश्यक पायाभूत कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी निगडी येथील कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस नगरसदस्य कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, प्रविण भालेकर, यश साने, निलेश नेवाळे, बापू घोलप तसेच नगरसदस्या संगीता ताम्हाणे, योगिता नागरगोजे, शितल वर्णेकर, रिटा सानप, शिवानी नरळे, सोनम मोरे, अर्चना करांडे उपस्थित होते. याशिवाय क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, उपआयुक्त संदीप खोत, प्रदीप ठेंगल, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, कार्यकारी अभियंते हरविंदरसिंह बन्सल, विजयसिंह भोसले, दमयंती पवार, राजेंद्र जावळे तसेच आरोग्य अधिकारी आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान प्रभागातील स्वच्छता, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते व इतर पायाभूत सुविधा, उद्याने तसेच नागरी सुविधांबाबत विभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे तसेच प्रलंबित विकासकामांना गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देताना सांगितले की, शहरातील स्वच्छता, अतिक्रमण नियंत्रण, पाणीपुरवठा, उद्यान व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय सेवा या सर्व विभागांनी अधिक समन्वयाने आणि वेळेत काम करणे आवश्यक आहे. प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य देण्यात यावे. ज्या ठिकाणी नागरिक वारंवार कचरा टाकतात त्या ठिकाणी सुशोभीकरण करून तेथील परिस्थितीत बदल घडवावा. तसेच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करताना त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे त्यांनी नमूद केले.
यासोबतच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे तातडीने सुरू करून वेळेत पूर्ण करावीत, उघड्या गटारे व नाल्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या बसवाव्यात, तसेच शहरातील विविध भागातील ड्रेनेज लाईनची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक मशिनरींची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महापालिकेच्या विविध विभागांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्राधान्याने उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच नगरसदस्य आणि नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विहीत वेळेत निपटारा करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय क्षेत्रीय कार्यालयनिहाय श्वान संगोपन केंद्र उभारण्यासाठी नगरसदस्यांसोबत संभाव्य जागांची पाहणी करण्यास सांगण्यात आले. या सर्व कामांचा पुढील तीन महिन्यांनी पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
दरम्यान, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी कार्यालयीन संरचना, अतिक्रमण कारवाईचा अहवाल, पोर्टलवरील तक्रारींचा निपटारा, प्रलंबित तक्रारी तसेच उत्पन्न व जमा रकमेचा तपशील याबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी नगरसदस्यांनीही त्यांच्या प्रभागातील समस्या व आवश्यक सुविधांबाबत महापौरांसमोर मांडणी केली.

