भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश, PMRDA कडून सुमारे १ हजार कोटींच्या निविदा प्रसिद्ध
पिंपरी–चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेली पवना नदी आणि वारकरी संप्रदायाची आस्था असलेली इंद्रायणी नदी यांच्या स्वच्छता, संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी राबवण्यात येणारा उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने वेगाने पुढे सरकू लागला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत सुमारे १ हजार कोटी रुपयांच्या विविध निविदा प्रसिद्ध झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत सातत्याने पाठपुरावा करत शासनाचे लक्ष वेधणारे नेतृत्व म्हणून भाजपा आमदार महेश लांडगे यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. त्यांनी “नमामी इंद्रायणी” आणि पवना नदी सुधार प्रकल्प हा विषय सातत्याने सभागृहात आणि शासनदरबारी मांडत प्रशासकीय व आर्थिक मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी–चिंचवड महापालिका हद्दीतील इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी यापूर्वीच ५२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर आता PMRDA मार्फत पवना व इंद्रायणी नद्यांच्या संवर्धनासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), मलनिस्सारण योजना, प्रदूषण नियंत्रण, नदी काठ संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवनाची कामे समाविष्ट असलेल्या निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आल्या आहेत.
उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प अंतर्गत नदीत थेट जाणारे सांडपाणी रोखणे, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया केंद्र उभारणे, नदी काठांचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरणीय समतोल राखणे यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात पूरस्थिती नियंत्रण, पाण्याची गुणवत्ता सुधारणा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
विशेष बाब म्हणजे, पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक संस्था आणि तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार करून सुधारित DPR (Detailed Project Report) तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्यासाठी ठोस नियोजन करण्यात आले आहे.
आमदार महेश लांडगे यांनी यापूर्वीच स्पष्ट भूमिका मांडली होती की, नदी संवर्धन हा राजकीय वादाचा विषय नसून भावी पिढ्यांच्या आरोग्याशी आणि शहराच्या शाश्वत विकासाशी संबंधित प्रश्न आहे. विधानसभा अधिवेशनात त्यांनी या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांच्या सकारात्मक आणि समन्वयात्मक भूमिकेमुळेच पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीनही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत.
या प्रकल्पामुळे पिंपरी–चिंचवड, पुणे आणि परिसरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण, प्रदूषणमुक्त नद्या आणि शाश्वत जलव्यवस्थापनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प पर्यावरणप्रेमींसह संपूर्ण शहरासाठी आशेचा किरण ठरत आहे.

