पिंपरी | प्रतिनिधी | १४ डिसेंबर
पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड ते मामुर्डी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ लगतच्या परिसरात गेल्या काही वर्षांत वाढलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत असून, या मार्गावर सात नवीन ठिकाणी “बॉक्स स्ट्रक्चर” (अंडरपास) उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामुळे वाकड ते मामुर्डी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार शंकर जगताप यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान सयाजी अंडरपास, भुमकर चौक, ताथवडे, पुनावळे, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन आणि मामुर्डी या सात ठिकाणी तातडीने बॉक्स स्ट्रक्चर उभारण्याची मागणी करण्यात आली.
वाकड ते मामुर्डी हा परिसर आयटी पार्क, औद्योगिक वसाहती, शैक्षणिक संकुले, निवासी टाउनशिप आणि व्यापारी केंद्रांमुळे झपाट्याने विकसित झाला आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या वाहनांचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या रस्त्यांची क्षमता अपुरी ठरत असल्याने वाकड ते मामुर्डी वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरली आहे.
या पार्श्वभूमीवर सेवा रस्त्यांचे अतिक्रमण हटवून डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि अंडरपासची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्याचबरोबर पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथे बॉक्स पुश-अप तंत्रज्ञानाद्वारे अंडरपास बसवण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. आता प्रस्तावित सात नवीन बॉक्स स्ट्रक्चरमुळे महामार्गावरील आणि सेवा रस्त्यांवरील वाहतूक वेगळी होऊन क्रॉसिंग अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे.
आमदार जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाणेर, बालेवाडी, वाकड, हिंजवडी, किवळे आणि रावेत परिसरात दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. प्रवासासाठी लागणारा वेळ वाढल्याने उद्योग, व्यापार आणि दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे. त्यामुळे वाकड ते मामुर्डी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अतिरिक्त पर्यायी मार्गांची नितांत गरज आहे.
प्रस्तावित बॉक्स स्ट्रक्चर उभारल्यास स्थानिक नागरिक, पादचारी, दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी बिना अडथळा वाहतूक व्यवस्था निर्माण होईल. मालवाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या महामार्गावर गती आणि सुरक्षितता दोन्ही वाढणार आहेत. अपघातांचे प्रमाण कमी होऊन पर्यावरणीय प्रदूषणातही घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार शंकर जगताप म्हणाले की, “वाकड ते मामुर्डी या भागाचा वाढता औद्योगिक व शैक्षणिक विस्तार पाहता दीर्घकालीन वाहतूक नियोजन आवश्यक आहे. सेवा रस्त्यांना प्राधान्य देत अतिक्रमणमुक्ती व डांबरीकरण करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना सात नवीन बॉक्स स्ट्रक्चरचा प्रस्ताव दिला असून, त्यातून वाकड ते मामुर्डी वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल.”

