पिंपरी, दि. 1 जानेवारी (प्रतिनिधी):
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकास इतिहासात लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे योगदान अढळ असून त्यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले कार्य कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पिंपळेगुरव येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ ‘शक्तीस्थळा’च्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यानंतर लक्ष्मणभाऊ जगताप यांची आठवण आपोआप होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, उभारलेल्या योजना आणि सामान्य माणसाच्या जीवनात घडवलेला बदल आजही दिसून येतो. कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारे हे शक्तीस्थळ आगामी काळात नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी औद्योगिकीकरणामुळे वेगाने विस्तारत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला आधुनिकतेकडे नेण्याचे स्वप्न पाहिले. राज्य सरकार आणि महापालिकेतील समन्वय साधत त्यांनी विकासाचे व्हिजन प्रत्यक्षात उतरवले. 24×7 पाणीपुरवठा, नदी सुधार प्रकल्प, कचऱ्यापासून वीज निर्मिती यांसारख्या योजनांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार बापूसाहेब पठारे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार शंकर जगताप यांनी आपल्या भाषणातून लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत भावनिक आठवणींना उजाळा दिला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आम्ही कायम जगताप कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. लक्ष्मणभाऊंनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे.” त्यांनी लक्ष्मणभाऊंच्या संघर्षमय राजकीय प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की, कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर नेतृत्व उभे केले. नगरसेवक म्हणून सुरुवात करून चार वेळा आमदार म्हणून त्यांनी शहराच्या विकासाला गती दिली.
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे वारकरी संप्रदायाशी असलेले नाते, मातीशी जोडलेली नाळ आणि सामान्य माणसांप्रती असलेली आपुलकी यामुळेच ते जनतेचे नेते ठरले. त्यांच्या नेतृत्वामुळे पिंपरी-चिंचवडला ‘मिनी महाराष्ट्र’ अशी ओळख मिळाली. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी शहराला पुढे नेण्याचा ध्यास घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, लक्ष्मणभाऊंच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. मात्र त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आज या शक्तीस्थळाच्या माध्यमातून अधिक बळकट झाला आहे. हे शक्तीस्थळ कायम प्रेरणा देणारे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक कार्यकर्ते भावूक झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

