पिंपरी-चिंचवड | पुनावळे
८ जानेवारी २०२६
प्रभाग २५ मध्ये भाजपची उमेदवारी जाहीर होताना काही इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर चित्र कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या प्रचार कार्यक्रमात भाजपच्या जुन्या–नव्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत, “राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः” हे तत्व प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केले आहे. ग्रामस्थांची मोठी उपस्थिती आणि संघटनेतील एकजूट पाहता भाजप उमेदवारांच्या विजयाचे गणित अधिक भक्कम होत असल्याचे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला पुनावळे गावठाणातून सुरुवात झाली. भाजपच्या उमेदवारांनी पारंपरिक पद्धतीने ‘प्रचाराचा नारळ’ वाढवून भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेत भाजपचे जुने व नवे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपस्थितीमुळे प्रभाग २५ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
प्रभाग २५ मधील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ पुनावळे गावठाणातून झाला. यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल तानाजी कलाटे, रेश्मा चेतन भुजबळ, श्रुती राम वाकडकर आणि कुणाल वाव्हळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रचाराच्या प्रारंभीच नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपसाठी सकारात्मक संदेश देणारा ठरला.
यावेळी चेतन भुजबळ, राम वाकडकर, विशाल आप्पा कलाटे, नवनाथ ढवळे, राहुल काटे, भारती ताई विनोदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ भाजप पदाधिकारी उपस्थित होते. नवनाथ ढवळे आणि भारती ताई विनोदे यांनी आपली भूमिका मांडत भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच सर्वांची ताकद एकत्र आल्याने आता प्रभागात सकारात्मक बदल घडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला, तर नवनाथ ढवळे यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांचा विशेष उल्लेख केला.
प्रचारादरम्यान उमेदवार राहुल कलाटे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात कार्यकर्त्यांशी आणि उपस्थित सर्वांशी संवाद साधत सर्वांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटना, कार्यकर्ते आणि नागरिक यांची साथ मिळाल्यास वाकड , ताथवडे आणि पुनावळे (प्रभाग २५) या संपूर्ण भागाचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने साध्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
“आपला भाग दोन वेगवेगळ्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात विखुरलेला आहे. त्यामुळे काही निर्णय होताना सर्वांचा समन्वय आवश्यक असतो. आज जुन्या–नव्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जी एकजूट दाखवली आहे, त्याच बळावर आपण प्रभाग २५ चा सर्वांगीण आणि दर्जेदार विकास करू. यासाठी प्रभागातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन देखील महत्त्वाचे ठरत आहे, त्यामुळे सर्व मतभेद मागे ठेवून आता फक्त विकासासाठी काम करायचे आहे आणि हीच एकजूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला विजयाकडे घेऊन जाणार आहे.” – राहुल कलाटे, भाजप उमेदवार, प्रभाग २५

