पिंपरी चिंचवड (वाकड), दि. १४ मार्च : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (१३ मार्च) पार पडली. या सभेत शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. महिनाभरानंतर झालेल्या या सभेत पाणीपुरवठा संदर्भात प्रशासनाने कोणती ठोस पावले उचलली याबाबत स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी करत भाजपचे नगरसेवक राहुल कलाटे सभागृहात आक्रमक झाले.
शहरातील वाकड, ताथवडे, पुनावळे तसेच रावेत पंपिंग स्टेशनमार्फत पाणीपुरवठा होत असलेल्या भागांना नियमित व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पवना जलवाहिनी प्रकल्पाला तातडीने निधी देऊन कामाला गती देण्याची आवश्यकता आहे, असे कलाटे यांनी सभागृहात ठामपणे मांडले.
कलाटे म्हणाले की, “नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. पाण्यासाठी निधीअभावाचे कारण सांगणे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपने सत्तेत येताना पिंपरी-चिंचवडकरांना नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले आहे आणि ते पूर्ण झालेच पाहिजे.”
सभेत स्मार्ट सिटी योजना, दररोजचा पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली. यावेळी पाण्याच्या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधत कलाटे यांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारले.
रावेत पंपिंग स्टेशनमधील पाण्याचा दर्जा खालावत असल्याची चिंता
कलाटे म्हणाले की, पवना धरणातून सोडण्यात येणारे पाणी रावेत येथील पवना नदीवरील बंधाऱ्यातून उचलून शुद्ध करून संपूर्ण शहराला पुरवले जाते. मात्र रावेत पंपिंग स्टेशन परिसरातील पाण्याचा दर्जा खालावत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
या संदर्भात पाण्याच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी महापालिकेने २० लाख रुपये खर्च करून नेमलेल्या संस्थेमार्फत नेमके कोणते काम केले जाणार आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच महापौरांनी यापूर्वी जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली होती. त्या भेटीनंतर महिनाभरात कोणती ठोस कार्यवाही झाली याबाबत सभागृहाला माहिती देण्यात यावी, असेही कलाटे यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी योजनेवरही प्रश्न
स्मार्ट सिटी योजनेबाबत बोलताना कलाटे म्हणाले की, या योजनेचा आवाका समजून घेतला पाहिजे. या योजनेत पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर या दोन गावांचा समावेश होता. त्यामुळे प्रत्यक्ष विकासकामे या भागांपुरतीच मर्यादित राहिली.
मात्र या योजनेतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे यांसारखे काही महत्त्वाचे प्रकल्प सुरू झाले आहेत. शहराच्या सुरक्षिततेसाठी हे महत्त्वाचे असले तरी ठेकेदाराने बसवलेले अनेक कॅमेरे सध्या कार्यरत आहेत का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून त्यांची देखभाल व दुरुस्ती करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पवना जलवाहिनी प्रकल्प १५ वर्षांपासून रखडलेला
पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पवना जलवाहिनी प्रकल्प गेल्या १५ वर्षांपासून रखडलेला आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर सुमारे २०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सुरुवातीला सुमारे ४०० कोटी रुपये असलेला या प्रकल्पाचा अंदाजित खर्च आता तब्बल १२५६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तरीही हा प्रकल्प अद्याप कागदावरच असल्याची स्थिती आहे.
लोकसंख्या वाढत असताना शहरातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून पवना जलवाहिनी प्रकल्पाला गती द्यावी, अशी जोरदार मागणी कलाटे यांनी सभागृहात केली.
“नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने बजेटचे कारण सांगणे दुर्दैवी आहे. स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठ्याचे भाजपने पिंपरी-चिंचवडकरांना आश्वासन दिले आहे. ते पूर्ण झालेच पाहिजे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून पवना जलवाहिनी प्रकल्पाला तातडीने गती द्यावी.”
— राहुल कलाटे, नगरसेवक (भाजप)

