चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२५): मराठी रंगभूमीला गतिमान ठेवणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचा वर्धापन दिन यंदा विशेष सोहळ्याने साजरा होणार आहे. २३ ऑगस्ट २०२५ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे हा सांस्कृतिक सोहळा रंगणार असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमास अशोक हांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शाखेला यंदा २९ वर्षे पूर्ण झाली असून, गेल्या तीन दशकांत परिषदेनं मराठी नाट्यचळवळीला नवे उभारी दिली आहे. यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मानांनी मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.
मान्यवरांना बहिण्यात येणारे पुरस्कार
🔹 ‘कै. बालगंधर्व पुरस्कार’ – ज्येष्ठ नाट्यसंगीतकार ज्ञानेश पेंढारकर 🔹 ‘आचार्य प्र. के. अत्रे पुरस्कार’ – अभिनेता, कवी, लेखक संकर्षण कऱ्हाडे 🔹 ‘कै. अरुण सरनाईक पुरस्कार’ – अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे 🔹 ‘कै. स्मिता पाटील पुरस्कार’ – कवयित्री व अभिनेत्री स्पृहा जोशी 🔹 ‘कै. जयवंत दळवी पुरस्कार’ – लेखक अरविंद जगताप
याचबरोबर शहराचे भूषण पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुरेश साखवळकर यांचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल विशेष सत्कार होणार आहे.
स्थानिक कलाकारांचा विशेष सन्मान
नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञांना प्रोत्साहन दिले जाते. यंदा विशेष पुरस्कारासाठी सुवर्णा काळे, रति देशमुख, संदीप जम्माड देशमुख, संदीप बबलू जगदाळे आणि सोमनाथ तरटे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच राज्य नाट्य स्पर्धा २०२४ मधील विजेते कलाकार मनोहर जुवाटकर, कमलेश बिचे, विनायक परदेशी, अथर्व कुलकर्णी, श्रुती भोसले आणि दिनेश साबळे यांचाही या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे.
नाट्य परिषदेचे कार्य
पत्रकार परिषदेत माहिती देताना अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, नाट्य परिषदेच्या शाखेने आजवर दोन नाट्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केले असून, शहराच्या सांस्कृतिक वैभवात सतत भर घातली आहे. पिंपरी-चिंचवड हे केवळ औद्योगिकच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध व्हावे, यासाठी परिषद विविध उपक्रम राबवत असते.
प्रेक्षकांसाठी निमंत्रण
२३ ऑगस्ट रोजी होणारा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद वर्धापन दिन २०२५ हा सोहळा नाट्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. मराठी रंगभूमीवरील मान्यवरांना गौरविताना प्रेक्षकांना एक संस्मरणीय क्षण अनुभवायला मिळणार आहे.

