निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू – वर्षाराणी मुस्कावाड
पिंपरी, पुणे (दि. १८ ऑगस्ट २०२५) – “निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू आहे. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी काव्यलेखन हेच सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. देशाच्या स्वातंत्र्यात कविता आणि साहित्याचे अमूल्य योगदान आहे”, असे प्रतिपादन नांदेड येथील ज्येष्ठ लेखिका वर्षाराणी मुस्कावाड यांनी केले. त्या आर्य समाज पिंपरी राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

या वर्षी आर्य समाज पिंपरी संस्थेचा रौप्यमहोत्सवी श्रावणधारा काव्य संमेलन व राज्यस्तरीय समाजभूषण-कार्यगौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सलग पंचवीस वर्षांपासून आर्य समाज सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि कवींना प्रोत्साहन देत आहे, याचा विशेष उल्लेख उपस्थित मान्यवरांनी केला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितल मालुसरे, उद्योजक श्रीहरी कुलकर्णी, आर्य समाज पिंपरीचे प्रमुख मुरलीधर सुन्दराणी, अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, सचिव दिनेश यादव, हास्यकलाकार आर. के. चोपडा, कवी उत्तम दंडीमे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळा
समाजभूषण आणि कार्यगौरव पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये – दत्ता सूर्यवंशी (क्रीडा) शुभांगी शिंदे (साहित्य) सुधीर फेंगसे (कामगार) नवनाथ मोरे (सामाजिक कार्य) मारुती बाणेवार (पत्रकारिता) सीमा गांधी (पर्यावरण) रवींद्र कुरवडे (औद्योगिक क्षेत्र) वैजू चांदवले (कला)
यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन राजेंद्र सगर, प्रस्तावना उत्तम दंडीमे, तर आभारप्रदर्शन नलिनी देशपांडे यांनी केले.
काव्य व सामाजिक प्रबोधन
संपन्न झालेल्या आर्य समाज पिंपरी राज्यस्तरीय काव्य संमेलनात कवींनी देशभक्ती, आधुनिक शिक्षण, शेतकरी समस्या, भ्रष्टाचार, पर्यावरण संवर्धन, गोरक्षण आणि भारतीय संस्कृती यासह अनेक विषयांवर प्रभावी कविता सादर केल्या. श्रावणधारेच्या निमित्ताने काव्यातून झालेले सामाजिक प्रबोधन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे ठरले.
२५ वर्षांचा गौरवशाली प्रवास
आर्य समाज पिंपरी संस्थेने मागील पंचवीस वर्षांत साहित्य, संस्कृती आणि समाजप्रबोधनासाठी घेतलेले उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत. या प्रवासाचेच प्रतीक म्हणून यावर्षीचे राज्यस्तरीय काव्य संमेलन अधिक भव्य स्वरूपात झाले.

